मुंबईत तुफान पाऊस   

भुयारी मेट्रो रेल्वे स्थानकातही पाणी घुसले

मुंबई, (प्रतिनिधी) : अपेक्षेपेक्षा दोन आठवडे आधीच महाराष्ट्रात पोहोचलेल्या मान्सूनने मुंबईसह अनेक जिल्ह्यांत सोमवारी अक्षरशः दाणादाण उडवून दिली.  मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढले. तब्बल १०७ वर्षांनंतर मुंबईत मे महिन्यात विक्रमी पाऊस झाला. अवघ्या काही तासांत २९४ मिमी पाऊस कोसळल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. भायखळा, वरळी, लालबाग, परळ, दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, सांताक्रूझ भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. नव्याने सुरू झालेली भूमिगत मेट्रो सेवाही स्थानकात पाणी घुसल्याने बंद करावी लागली. पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाली. त्यामुळे सरकारच्या दाव्यांचे पितळ उघडे पडले असून, त्यांना आरोपांच्या ‘अतिवृष्टी’ला समोरे जावे लागत आहे! हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
मान्सूनचे केरळात १ जून रोजी तर मुंबईत १० जूनपर्यंत आगमन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे आठ दिवस आधीच मान्सूनचे शनिवारी केरळात आगमन झाले व अवघ्या २४ तासांत वार्‍याच्या वेगाने मान्सून महाराष्ट्रात पोहोचला. दोन आठवडे आधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने मुंबईची अक्षरशः दाणादाण उडाली.  यापूर्वी, १९१८ मध्ये मुंबईत २७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तो विक्रम रात्रीपासून कोसळणार्‍या पावसाने मोडला. मुंबईत काल सकाळपर्यंत २९४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
 
नरिमन पॉइंट परिसरात २४ तासांत तब्बल २५२ मिमी पावसाची नोंद झाली. हीच परिस्थिती मध्य मुंबई, मुंबई उपनगर व शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात होती. 

मुंबई जलमय; रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत

रविवारी रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यासोबतच, तिन्ही मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. दृश्यमानता कमी असल्याने विमानसेवेवरही परिणाम झाला होता. 
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून मुंबई यावेळी तुंबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. पण, पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली. त्यातच काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या  बांद्रा-कुर्ला संकुल ते वरळी या अ‍ॅक्वा लाइन-३ या भुयारी मेट्रो सेवेला पावसाचा फटका बसला. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी घुसल्याने मेट्रो सेवा थांबवावी लागली.

हवामान विभागाचा रेड अलर्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 
 

Related Articles